रत्नागिरी जिल्ह्यात पर्याप्त आरोग्य सुविधान बाबत प्रश्नचिन्ह: अॅड. दिपक पटवर्धन.
‘कोरोना’ ग्रस्तांची संख्या दररोज वाढत आहे. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधील यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. ऐैन मोक्याच्या वेळी सिव्हील सर्जन रजेवर जातात. मुळात डॉक्टरांची कमतरता, नर्स , वॉर्ड बॉय यांची प्रचंड कमतरता, त्यात टेस्टिंग किट कमतरता असल्याच्या बातम्या. त्यामुळे रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधा प्राप्त होणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ”असतील त्या मावळ्यांना बरोबर घेत खिंड लढवायची” अशी स्थिती जिल्हा रुग्णालयात दिसत आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय हे पुरेशा संख्येने नसतील तर रुग्णसेवेवर त्याचा विपरीत परिणाम होणारच. मात्र शासन याबाबत गंभीर नाही. रत्नागिरीमध्ये शासन प्रशासन यामध्ये समन्वय नाही. नेमके निर्णय कोण करतो हेच कळत नाही. पालकमंत्र्यांची नेमकी भूमिका काय याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
‘रायपाटण’ राजापूर हे ‘कोरोना’ सेंटर आहे. पण आज त्या ठिकाणी पंचवीसच्या आसपास पेशंट असून एकच वैद्यकीय अधिकारी २४ तास ड्यूटी करतोय. अन्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्याठिकाणी ‘मेस’ किंवा ‘कॅन्टीन’ सुविधाही नाही अशी अवस्था सर्वदूर नजरेत येते आहे. सातत्याने प्रशासनाचे, मंत्रीमहोदयांचे लक्ष पत्र पाठवून वेधण्याचा प्रयत्न करूनही यंत्रणेत सुधारणा होताना दिसत नाही. आज परत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले असल्याचे ॲड. पटवर्धन म्हणाले. नव्या घोषणा ज्या प्राप्त परिस्थितीत अपेक्षित नाहीत त्या होताना आपण ऐकतो. मात्र आरोग्य सुविधांबाबत कोणतेही गांभीर्य नाही हे दुर्दैव आहे.
आरोग्य सुविधा योग्य पद्धतीच्या आणि योग्य प्रमाणात उपलब्ध करणे ही सर्वस्वी राज्यसरकारची जबाबदारी आहे. रत्नागिरी मधील वैद्यकीय सुविधां हा नेहमीच गंभीर विषय राहिला आहे. मात्र औद्योगिक, शैक्षणिक आणि आरोग्य या तिन्ही विषयासंदर्भात औदासिन्य राहिले आहे, शासन प्रतिनिधींनी या तीनही विषयांना कधीच प्राधान्य दिले नाही, केवळ निसर्गाचे वरदान म्हणूनच आज रत्नागिरी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या नागरिकांना कठीण प्रसंगात सामावून घेण्याची ताकद ठेवून आहे, त्याचेही भान शासनकर्त्यांनी ठेवावे, असे ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले.