
सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावाला यावर्षीचा कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या, जैवविविधतेने नटलेल्या व तब्बल ८५ हून अधिक नैसर्गिक पाण्याचे बारमाही स्रोत असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील असनिये गावाला यावर्षीचा कोकण विकास संस्थेचा ‘आदर्श गाव पुरस्कार २०२४’ जाहीर झाला आहे.कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यातील ५० हून अधिक ग्रामपुरस्कारांसाठी नामांकन झालेल्या गावांतून असनियेने सर्व पातळींवर अव्वल क्रमांक प्राप्त केला. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी मुंबई येथे या पुरस्काराची घोषणा केली. मुंबई येथे ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांना रोख २५ हजार रुपये, मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामपुरस्कारासाठी संस्थेने ऑनलाईन अर्ज मागविले होते.तिन्ही जिल्ह्यांतून ५० हून अधिक ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. गावात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय लोकोपयोगी योजना, आरोग्य, शैक्षणिक उपक्रम, गावातील प्रमुख पिके, शेती व्यवसाय, महिला बचतगट व सक्षमीकरणसाठी राबविण्यात येणारे उपक्रम यावर आधारित निकष ठेवले होते. असनियेत देवराई संवर्धन, धनेश (हॉर्नबिल) पक्षाला संरक्षण तसेच दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजाती पाहावायास मिळतात. वन्यप्राण्यांनी येथील जंगलसंपदा समृद्ध आहे. गावात एकही विहीर नसून, या गावाला बिनविहिरीचे गाव म्हणून देखील संबोधण्यात येते. गावात मद्यपानास बंदी असून, दारुबंदी पाळणारे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलेच गाव आहे.