
आरजीपीपीएल’मधील चालकांचे पगार थकले, ठेक्याची रक्कमच मिळालेली नाही; प्रशासनाचे दुर्लक्ष.
गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीजप्रकल्पातील वाहनांच्या ठेक्याची तीन महिन्यांची रक्कम न मिळाल्यामुळे चालकांचे पगार चार महिने थकलेले आहेत.रत्नागिरी वीजप्रकल्पातील विविध आस्थापनांमधील अधिकाऱ्यांसाठी १५ वाहने ठेकेदारी पद्धतीने घेण्यात आली आहेत. यामधील काही वाहने २४ तासांसाठी कंपनीत असतात. त्यामुळे चालकांची संख्या २४ आहे. हातावर पोट असलेल्या या चालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या चालकांनी मागील आठवड्यात एकत्र पगार न दिल्यास कामावर बहिष्कार टाकू, असा इशारा दिला होता.
त्यानंतर ठेकेदारांची धावपळ सुरू झाली होती. त्यांनी वाहन ठेक्याची ४ महिन्यांपासून थकित रक्कम तसेच अनामत आदी अन्य देणी त्वरित देण्याची विनंती केली. त्या वेळी झालेल्या चर्चेनंतर एका ठेकेदाराने सांगितले की, या प्रकल्पात काही अधिकारी हे थेट आरजीपीपीएल कंपनीने व्यवस्थापन विभागात नियुक्त केले आहेत तर त्या अधिकाऱ्यांवर व्यवस्थापक पदांवरील अधिकारी एनटीपीसीचे आहेत. या दोघांमध्ये समन्वय नाही. फाईलमध्ये तांत्रिक त्रुटी काढण्यात येत असल्यामुळे पुढील कार्यवाही रखडते. कंपनीने करारानुसार वेळेवर देयके दिली तर कामगारांचे पगार वेळेत होतील.