
रत्नागिरी शहरातील बाजारपेठ सुरूच राहणार, शहर व्यापारी संघटनेचा खुलासा
रत्नागिरी शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात कंटेनमेंट झोन केले आहेत. रत्नागिरी शहरातील ग्रामीण भागात रूग्ण आढळल्यानंतर पावस, लांजा, राजापूर, देवरूख आदी भागातील व्यापार्यांनी काही दिवसांकरिता बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रत्नागिरी शहरातील काही भागात रूग्ण आढळल्याने बाजारपेठा स्वेच्छेने सोमवारपासून पाच दिवस बंद ठेवाव्यात का? याबाबत विचार सुरू होता. मात्र अनेक व्यापार्यांनी या निर्णयाला विरोध केला. बाजारपेठा बंद ठेवुन काहीही निष्पन्न होणार नाही. उलट बाजारपेठा सुरू होतील त्यावेळी गर्दी आणखी वाढू शकते असे विचार मांडले गेले व बाजारपेठा सुरूच ठेवाव्यात असे बहुतांशी व्यापार्यांनी विचार मांडले. त्यामुळे आता रत्नागिरी शहरातील बाजारपेठ चालूच राहणार असल्याचा खुलासा व्यापारी संघटनेने केला आहे.
रत्नागिरी शहरातील बाजारपेठेतील काही दुकाने नियमाप्रमाणे दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ उघडी असल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. त्यामुळे अशा नियम मोडणार्यांवर कारवाई करण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. याशिवाय बाजारात खरेदीसाठी येणारे नागरिक तसेच काही व्यापार्यांकडूनही मास्कचे व अन्य सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वांनीच प्रशासनाने दिलेले नियम पाळणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com