
निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना आतापर्यंत सात कोटींहून अधिक भरपाईचे वाटप – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन लवकरात लवकर सुरळीत व्हावे यासाठी शासन गतिमान पद्धतीने काम करीत असून वाढीव मदत मिळण्यासाठी च्या बदललेल्या निकषानुसार आतापर्यंत 2900 हून अधिक बाधितांना सुमारे साडेसात कोटींहून अधिक रक्कम भरपाई म्हणून देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.
येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण प्रशासना सह बँकांचे अधिकारी देखील यासाठी येथेच मुक्कामी राहून काम करीत आहेत असे ते म्हणाले.
वेगवेगळ्या बँकेचे अधिकारी दापोली येथे ठाण मांडून बसले असून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातील सर्व बँका चांगले काम करत आहेत . काल दिवसभरात 2968 अंशता बाधित घरांना 15 हजार प्रमाणे 7 कोटी 58 लाख रुपयांची मदत चक्रीवादळ बाधित व्यक्तींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली तसेच आज 167 पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना 1 लाख 60 हजार प्रमाणे मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची माहिती श्री सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
उर्वरित नुकसान भरपाई चार दिवसात देणार
आज झालेल्या वाटपानंतर इतर शिल्लक राहिलेल्या सर्व बाधितांना त्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम येत्या चार दिवसात प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा होईल याचे नियोजन करण्यात आले असून सर्व बाधितांना त्यांच्या नुकसानीची भरपाई येत्या चार दिवसात दिली जाईल असे श्री सामंत यावेळी म्हणाले. यासाठीच पंचनाम्याच्या कामांना गती देण्यात आली असून चार दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होऊन रक्कम अदा करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रशासकीय इमारत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार विनायक राऊत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले नुकसान भरपाईच्या पूर्वीच्या निकषांमध्ये शासनाने बदल केले असून आता पूर्णतः घराचे नुकसान झाले असेल तर याआधी 95 हजार 100 रुपये मिळत होते यामध्ये 58 टक्के वाढ होऊन नवीन निकषानुसार आता दीड लाख रुपये तसेच भांडी व कपड्यांसाठी 10 हजार जादा रक्कम देण्यात येत आहेत .तसेच अंशतः घराचे नुकसान झालेल्यांसाठी याआधी 6 हजार रुपये देण्यात येत होते यामध्ये दीडशे टक्के वाढ होऊन आता 15 हजार रुपये तसेच भांडी कपड्यांसाठी 5 हजार जादा रक्कम देण्यात येत आहेत . याआधी फळबाग नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 18 अठरा हजार रुपये देण्यात येत होते नवीन निकषानुसार यामध्ये 178 टक्के वाढ होऊन 50 हजार रुपये प्रतिहेक्टर देण्यात येत आहेत.
कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीमध्ये त्याने झाड निहाय भरपाई देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली. पुन्हा अशा प्रकारची अडचण निर्माण झाली तर शेतकऱ्यांना कटर पुरवण्याचे आदेश तसेच या निसर्ग चक्रीवादळ मध्ये जी झाड अर्धवट तुटली आहेत त्यांना 18 महिन्यात पुनर्जीवित करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या मदतीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानी च्या कामांमध्ये प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे . त्याचप्रमाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
विद्यार्थ्यांचे भवितव्य महत्वाचे
महाविद्यालयांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत निर्णय घेताना विद्यार्थ्यांचे भवितव्य जपले जाईल व त्यांच्या करिअरवर कोणताही परिणाम होणार नाही या दृष्टिकोनातून अंतिम निर्णय घेतला जाईल असे याबाबत बोलताना श्री सामंत यांनी सांगितले. याबाबत वेगवेगळे विधाने करून कुणीही संभ्रमाचे वातावरण निर्माण करू नये असे सांगून ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी याबाबत काळजी करू नये.