
दापोली तालुक्यातील चिखलगावमध्ये शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी ‘लोकसाधना’संस्थेच्या ‘लोकनिर्माण भवन’ इमारतीची वादळात वाताहत
निसर्ग’ चक्रीवादळाचा मोठा फटका कोकणातल्या अनेक गावांना बसला. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील चिखलगावमध्ये, मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी ‘लोकसाधना’ ही सामाजिक संस्थाही त्याला अपवाद नाही. संस्थेच्या महाविद्यालयाच्या ‘लोकनिर्माण भवन’ या इमारतीची या वादळात वाताहत झाली आहे.
३० किलो वजनाचे चिरे भिंतीतून सुटून दूरवर जाऊन पडले, इतका वाऱ्याचा जोर जबरदस्त होता”, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त ऍड. कैवल्य दांडेकर यांनी दिली आहे. त्याखेरीज ग्रंथालय, आमराई तसेच संस्थेने गावासाठी उभारलेल्या बसथांब्याचेही मोठे नुकसान झाले आहे.पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामस्थांचे कामाच्या घाईचे दिवस आहेत. ‘या सर्व परिस्थितीत, संस्थेच्या वास्तूंचे नुकसान भरून काढणे आह्वानात्मक आहे’, असेही ते म्हणाले.
गेल्या ३८ वर्षांपासून परिसरातील ४६ गावांसाठी शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि समग्र ग्रामविकास अशा पंचसूत्रीवर संस्थेचे काम सुरू आहे. डॉ. राजा दांडेकर आणि शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांच्या दूरदृष्टीच्या व अथक मेहनतीच्या बळावर संस्थेने अनेकांच्या आयुष्यात प्रगतीची पहाट आणली आहे. पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण आणि व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेने, कौशल्ये शिकवून गावात उद्योजकता विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यापलिकडे जाऊन सामाजिक जाणीव जपण्याचा प्रयत्नही आजवर संस्था करत आली आहे. कोरोना संकटकाळात जवळपास ४३ खेड्यांमध्ये सुरू असलेला संस्थेचा ‘अन्नदान प्रकल्प’ हे त्याचेच एक उदाहरण आहे. हेच सामाजिक भान जपत, शाळेच्या काही माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी कोरोनाच्या संकटातही संस्थेसाठी श्रमदान करायला पुढे येण्याची तयारी दाखवली आहे.
www.konkantoday.com