कोरोनाच्या संकटाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहणार्‍या जाधव कुटुंबियाने खोदली ५६ फूट विहिर

आज देशावर आलेल्या कोरोनाकडे अनेकजण भीतीने व संकट म्हणून पहात असले तरी काहीजण या कोरोनाकडे सकारात्मक दृष्टीने पहात आहेत. कोरोनामुळे मिळालेला वेळ सत्कारणी लावण्यासाठी काहीजण वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील दंगलवाडी येथे जाधव कुटुंब राहते. या कुटुंबात जवळजवळ ५० सदस्य आहेत. या कुटुंबातील सदस्य व्यवसायानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असतात. या भागात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत असते. त्यामुळे ही टंचाईची समस्या कायमची दूर करण्यासाठी जाधव कुटुंबियांनी केवळ घरात न बसता विहिर खोदण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या कुटुंबातील बाळकृष्ण जाधव, भाई जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली जाधव कुटुंबियातील सदस्यांनी विहिर खोदण्यास सुरूवात केली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे विहिर खोदायचे काम चालू ठेवले. यासाठी कोणतीही यंत्रसामुग्री न वापरता पारंपारिक पद्धतीने ही जवळ जवळ ५६ फुटांची विहिर खोदली. जाधव कुटुंब करीत असलेल्या कामाची दखल येथील भवानी प्रसाद मित्रमंडळाने घेतली. तेही जाधव कुटुंबियांच्या मदतीला आले. या सर्वांमुळे आता विहिरीचे काम पूर्ण झाले असून या विहिरीला पाणी लागल्याने या कुटुंबाच्या श्रमाचेही सार्थक झाले आहे. त्यामुळे त्यांचा कायमचा पाणी टंचाईचा प्रश्‍नही आता विहिरीमुळे मार्गी लागला आहे. कुठल्याही गोष्टीकडे सकारात्मकदृष्ट्या पाहिले असता त्यातून चांगले निष्पन्न होते हे जाधव कुटुंबियांच्या कार्यामुळे आता उघड झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button