
एकनाथ शिंदेंचं विमान उशिरा उडालं, पण त्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले,
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर होते. दौरा पूर्ण झाल्यानंतर ते मुंबईला रवाना होण्यासाठी निघाले. मात्र, जळगाव विमानतळावर पोहचल्यानंतर तेथील वैमानिकाने विमान उड्डान करण्यास थेट नकार दिला.त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे विमान जळगाव विमानतळावर रखडल्याचे पाहायला मिळाले. तब्बल एक तास उशिराने विमान उड्डाणाला परवानगी मिळाली. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचा हा विलंब जामनेर तालुक्यातील एका महिलेच्या जीवनासाठी उपयोगी आला.
संत मुक्ताई आषाढी वारीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनानुसार त्यांनी कार्यक्रम आटोपून सायंकाळी सात वाजे पर्यंत विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते. तेथून ते खासगी विमानाने रात्री आठ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार होते. मात्र, जळगावच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांना रात्रीचे आठ वाजले. कार्यक्रम आटोपून शिंदे विमानतळावर पोहोचले. मात्र, एन वेळेस पायलटने उड्डाण भरण्यास नकार दिला.एकनाथ शिंदेंना रात्री उशिरा पर्यंत विमानतळावर ताटकळत राहावं लागलं.दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर तोडगा काढण्यासाठी वैमानिकाशी संवाद साधला. पायलटची अडचण त्यांनी समजून घेतली. विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला. याच दरम्यान एअर ट्रॅफिक कंट्रोलशीही बोलणे सुरू होते. या सर्व प्रक्रियेला पाऊण तास गेल्यानंतर विमान उड्डाणाला परवानगी मिळाली आणि शिंदे जळगावहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, त्यांचा दौरा आणि त्या दौऱ्याला झालेला विलंब एका महिलेचा जीव वाचविणारा ठरला आणि विलंब होऊनही त्यांचा दौरा सत्कारणी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमान उड्डाणास झालेल्या विलंब जामनेर तालुक्यातील शीतल आनंद बोरडे-पाटील या महिलेचे प्राण वाचवणारा ठरला आहे. या महिलेचे किडनी ट्रान्सप्लांट मुंबईत होणार होते. मात्र त्यासाठी तासाभरात मुंबईला पोहचणे आवश्यक होते. मात्र तासाभरात मुंबईला कसे जाणार? त्यासाठी कुठलाही पर्याय नव्हता. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विमान उड्डाणाला परवानगी न मिळाल्याने ते थांबून होते. ही बाब गिरीश महाजन आणि इतरांच्या लक्षात आली. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विमान उड्डाणाला परवानगी मिळताच त्यांनी तातडीने रुग्ण महिलेला उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा ही महिला मुंबईत दाखल झाली.