
शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सर्वांनी जपला पाहिजे.- अजित पवार
महायुतीचे काही नेते बेताल वक्तव्य करत आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मताशी सहमत नाही,” असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले.भाजपचे आमदार नीतेश राणे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत ते बोलत होते. नीतेश राणे मागील काही दिवसांपासून अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून राज्यात त्यांच्या विरोधात बोलत आहेत. यावर पवार आणि तटकरे यांनी भाष्य केले. मात्र, आमदार नीतेश राणे यांचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले.अजित पवार म्हणाले, ”सर्वांनी आपले विचार मांडावेत, पण ते मांडत असताना कोणत्याही समाजात दुही निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सर्वांनी जपला पाहिजे.”राजकीय पक्षातील एखाद दुसरी व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल, एखाद्या घटकाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोलते, तेव्हा त्याच्यामुळे समाजात दुही निर्माण होते. हे होता कामा नये. तुम्हाला तुमची विचारसरणी मांडायची असेल तर तुम्ही मांडू शकता; परंतु तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजात दुही निर्माण करता, जे समाजासाठी चांगले नाही, ” असे पवार यांनी सुनावले.