
‘वंचित’चे नेते सुजात आंबेडकरांनी दिली विशाळगडाला भेट; हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यात घेतलं दर्शन!
“हिंदू – मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींची चुकीची प्रतिमा उभारली जात आहे. गडाची देखभाल करणाऱ्यांना जे लोक त्रास देत आहेत, ते चुकीचे आहे.
गडावरील सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी काल किल्ले विशाळगडला भेट दिली. गडावरील उरुसाच्या पहिल्या दिवशी आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांसह हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यामध्ये भेट देऊन दर्शन घेतले. गजापूर बौद्धवाडी व गडावर त्यांचे स्वागत करण्यात आले.ग्रामस्थ व प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. दोन जातींमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटक, भाविक, इतिहासप्रेमी यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध न येता हा ऐतिहासिक गड उघडा राहायला पाहिजे.
हिंदू – मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींची चुकीची प्रतिमा उभारली जात आहे. गडाची देखभाल करणाऱ्यांना जे लोक त्रास देत आहेत, ते चुकीचे आहे. तो छत्रपतींचा अवमान आहे.’ पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाळगड व गजापूर परिसरात सहा पोलिस अधिकारी व सत्तर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. सकाळी दहा ते पाच या वेळेत आज उरुसाच्या पहिल्या दिवशी सुमारे दोन हजार भाविक व पर्यटकांनी हजेरी लावली.