
सक्षम अधिकाऱ्यांना हजर करावे; गुहागर प्रेमी नागरिकांची प्रशासनाकडे मागणी.
खराब रस्त्याबाबत १९ मेच्या लोकशाही दिनात विचारणार जाब
: सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर लाक्षणिक उपोषणआबलोली : गुहागर शहर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह या दरम्यान खराब रस्त्यावर चांगले कार्पेट मारून मिळावे या मागणीसाठी सातत्याने नागरिक स्थानिक प्रशासनाकडे मागणी करीत आहेत. मागील लोकशाही दिनात दिलेले वचन न पाळल्याने केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकण्यात आली; मात्र आंदोलनची दिशा निश्चित करण्यासाठी ११ मे रोजी बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत १९ मे रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात याबाबत नागरिक जाब विचारणार आहेत. या लोकशाही दिनात प्रशासनाने राष्ट्रीय महामार्गाच्या सक्षम अधिकाऱ्यांना तयारीनिशी बोलवावे, अशी मागणी करण्यात येणार असून, लोकशाही दिनात या कामाबाबत सकारात्मक उत्तर मिळाले नाही, तर मात्र लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुहागर प्रेमी नागरीकांची ही सभा गुहागर तालुक्यातील मोडका आगर येथील विशाल बोटिंग क्लब येथे अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या वेळी योग्य दिशेने आंदोलन करण्याचे निश्चित झाले असून नागरिकांच्या मागण्या तालुक्यातील प्रशासनाद्वारे पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. पीएम कोर्टात या खराब रस्त्याबाबत तक्रार करण्याचे ठरविण्यात आले असून, जिल्हास्तरावरील अत्यावश्यक सेवेच्या पोर्टलवर नागरिकांनी मोठ्या संख्येने तक्रारी कराव्या, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तसेच १९ मे च्या लोकशाही दिनात या कामाबाबत सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर मात्र लाक्षणिक उपोषण करण्यासही घोषित करण्यात आले.याबाबतीत दिवस निश्चित करण्यासाठी गुहागर शहर परिसरातील नागरिकांना विश्वासात घेतले जाणार असून, हे उपोषण सन्मार्गाने छेडले जाईल, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. या बैठकीला मुंबईचे मनोहर घुमे, विश्वनाथ रहाटे, अनिल शिंदे, नितीन खानविलकर, अरुण भुवड, अनिल रावणंग, जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यामध्ये गुहागर तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी राजकारण विरहित विकासासाठी गुहागर फोरम निर्माण करण्यासाठी सभेत विशेष चर्चा करण्यात आली. या चर्चेत गुहागर तालुक्यातील आरोग्य सेवा व परप्रांतीय रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या याबाबत मनोहर घुमे व नितिन खानविलकर यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. सभेला गुहागरप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. विश्वनाथ रहाटे यांनी सर्वांचे आभार मानले.