
राजन तेली यांची हकालपट्टी करा, मंत्री दीपक केसरकर यांची मागणी
राजन तेली यांचे राज्यातील अस्तित्व काय आहे?तेली सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादीत आहेत; मात्र आमदार होण्यासाठी ते पातळी सोडून टीका करत आहेत. मी महायुतीचा धर्म पाळणारा आहे. त्यामुळे तेली यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी मी त्यांच्या नेत्यांकडे करणार आहे. यापुढे तेली हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्यांच्या टीकेवर उत्तर आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते देतील, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले.श्री. तेली यांनी नुकतीच केसरकर यांना संच मान्यतेच्या निकषावरून टीका होती. केसरकर यांना शालेय शिक्षण खाते समजले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची अवस्था दुर्दैवी झाली आहे, असे म्हटले होते. त्याला केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ”मी तीनदा आमदार होऊन दोनदा मंत्रीझालो आहे. माझे शिक्षणमंत्री म्हणून काम काय आहे, याचा अभ्यास तेलींनी करावा. त्यानंतरच टीका करावी. विविध उपक्रम आम्ही राबविलेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्डचे तीन रेकॉर्ड आम्ही केले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांना टीआर पदवी दिली आहे. माझ्या कामाचं कौतुक महाराष्ट्र करत आहे.”ते म्हणाले, ”तेली यांचे पराभूत खासदार विनायक राऊत यांच्याशी सूर जुळतांना दिसत आहेत; मात्र, महायुतीचा धर्म न पाळता तेली माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. मी महायुतीचा धर्म पाळत असल्याने गप्प आहे. शिवाय त्यांच्यावर बोलण्याएवढे ते मोठे नाहीत. त्यांच्या मर्यादा ह्या केवळ जिल्ह्यापुरत्या आहेत. त्यामुळे मी भाजपच्या नेत्यांकडे त्यांची पक्षातून हाकालपट्टी करा, अशी मागणी करणार आहे.”