कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ गठीत करणेसाठी सचीव पातळीवर समिती स्थापन

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांचे अध्यक्षतेखाली कोकणसाठी स्वतंत्र विद्यापिठ निर्मितीकरीता सकारात्मक चर्चा होवून तातडीने विषय मार्गी लागणेकरीता प्रयत्न करणेचे ठरले.
मुंबई विद्यापिठाच्या 826 महाविद्यालयाच्या अवाढव्य वाढीमुळे प्रशासनावर ताण पडत असल्याने स्थानिक गरजेप्रमाणे रोजगारक्षम अभ्यासक्रमासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्राच्या 83 महाविद्यालयासाठी स्वतंत्र कोकण विद्यापिठ स्थापण्याची गरज समितीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.
उपकेंद्रामुळे कोकणचे शैक्षणिक प्रश्न सुटणार नाहीत असे प्रतिपादन रमेश कीर यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत कोकण विद्यापिठाचा प्रश्न लवकर सुटण्याकरीता आग्रह धरणेत आला. जमीन व निधीची अडचण येणार नाही अस आश्वासन उदय सामंत यांनी दिले.
या महत्वपूर्ण बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, कृती समितीचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, सचीव सौरभ विजय, उपसचीव सतीश तिडके, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, डॉ. धनंजय माने, डॉ. संजय जगताप, रमेश कीर, सदानंद भागवत आदी मान्यवर हजर होते.
सचीव विजय सौरभ यांचे अध्यक्षतेखाली विद्यापिठ, मेरिटाईम, पर्यटन आदी खत्यांच्या प्रतिनिधीं बरोबर अॅड. विलास पाटणे, रमेश कीर, सदानंद भागवत यांचा समावेश असलेली समिती नेमणेत आली.
सातशे चौसष्ट महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने 1857 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशीरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब, अभ्यासमंडळ व प्राध्यापकांच्या नियुक्तीस होणारा विरोध हा मूलत: विद्यापीठाचा वाढलेला पसारा कारणीभूत आहे. मुंबई विद्यापीठाची स्वतःची अशी परंपरा व प्रतिष्ठा होती, परंतु अलीकडे राजाबाई टॉवरला प्रचंड धक्के सहन करावे लागत आहेत. गोव्याच्या सीमेवरील दोडामार्ग महाविद्यालयातील विद्यार्थी – प्राध्यापकांना 550 कि.मी. अंतरावरील विद्यापीठाच्या कामाकरिता मुंबई येथे जाणे अवघड होऊन बसले आहे.
कोकणातील रत्नागिरीमधील 45, सिंधुदुर्गामधील 38 तसेच दक्षिण रायगडमधील 20 अशी मिळून 103 महाविद्यालयांकरिता स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करणे ही काळाची गरज आहे. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास कोकणातील स्थानिक गरजेप्रमाणे सुसंगत असे रोगगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील. यामध्ये समुद्रविज्ञान, नारळ संशोधन विज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच मेरिटाईम व रेल्वे तंत्रज्ञानासंबंधी अनेक अभ्यासक्रम सुरु करता येईल.
कोकण विद्यापीठातील अभ्यासक्रमाची निवड करताना कोकणी संस्कृतीचा प्राधान्याने विचार करता येईल. कोकणातील या दोन्ही जिल्ह्रात भौगोलिक सलगता तसेच शैक्षणिक प्रश्न समान आहेत. प्रवास, वेळ, खर्च वाचल्याने प्रशासनामध्ये अधिक कार्यक्षमता निर्माण होईल.
मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राने अपेक्षा फोल ठरविल्या आहेत. उपकेंद्र सक्षम नाही. सिंधुस्वाध्याय सारखे कोर्स बंद पडले तर रेल्वेला लागणा-या तंत्रज्ञानाचे नवीन कोर्स उपलब्ध झालेले नाहीत. उपकेंद्राला पूर्णवेळ को-ऑर्डीनेटर नाहीत. तसेच अॅकेडिक सुपरवायझर उपलब्ध नाही. थोडक्यात उपकेंद्रात लोकसहभाग नाही. तसेच स्थानिक गरजेप्रमाणे कौशल्यावर आधारित कोर्सेस नाहीत.
कोकणामध्ये नव्यान स्थापन झालेल्या कोकण बोर्डातील दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्याथ्र्यांनी सलगपणे सात वर्षे महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकणातील विद्यार्थी, हुशार, प्रामाणिक, कष्टाळू असल्याने कोकण विद्यापीठ देखील स्वतःचे असे स्वतंत्र असे स्थान निर्माण करुन कालांतराने आपल्या स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहून दमदारपणे वाटचाल करेल.
सोलापूर या केवळ एका जिल्ह्रातील 36 महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाले. तसेच गोंडवाना, स्वामी रामानंदतीर्थ अशी छोटी विद्यापीठे सक्षम झाली. कोकणासाठी स्वतंत्र विद्यापिठाच्या निर्णयामुळे, टिळक आंबेडकरांच्या कोकणात विद्याथ्र्यांना स्वतःचे असे हक्काचे व्यासपिठ उपलब्ध होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button