
इथे परीट समाजाच्या लोकांनी ओवाळणी केल्याशिवाय ब्राह्मण समाजाची दिवाळी सुरू होत नाही.
वेगवेगळ्या सणासमारंभात वेगवेगळ्या प्रथा परंपरा दिसून येतात. संगमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये अशीच एक परंपरा दिवाळीच्या सणाशी निगडीत आहे. इथे परीट समाजाच्या लोकांनी ओवाळणी केल्याशिवाय ब्राह्मण समाजाची दिवाळी सुरू होत नाही.दिवाळी हा दिव्यांचा सण. नरक चतुर्दशीला केल्या जाणाऱ्या अभ्यंग स्नानाला मोठे महत्व आहे. दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिली आंघोळ म्हणून या स्नानाची ओळख आहे. सकाळी लवकर उठून, सुगंधी उटणे लावून स्नान करणे आणि त्यानंतरचा फराळ म्हणजे दिवाळीच्या सणाचा अविभाज्य भाग असतो. संगमेश्वर परिसरात परीट समाज या दिवशी एक आगळीवेगळी परंपरा जपत आहे. धामणी येथे राहणाऱ्या मारुती गंगाराम चव्हाण यांनी चार पिढ्यांच्या परंपरेची माहिती दिली. नरक चतुर्दशीच्या दिवशी धामणी गावातील परीट समाजाचे लोक पहाटे घराबाहेर पडतातआणि गावातील ब्राह्मण, खोत यांच्याकडे जातात. पूर्वी अभ्यंग स्नानाला अशा घरातील ज्येष्ठांना ओवाळून त्यांना उटणे लावण्याचा परंपरा हे परीट समाजाचे लोक जपत असत. कालांतराने आंघोळीच्या वेळी उटणे लावण्याची परंपरा मागे पडली पण घरी जाऊन ओवाळणी करण्याची प्रथा आजही सुरू आहे. या लोकांनी घरी येऊन ओवाळून होईपर्यंत ब्राह्मण आणि गावातील प्रतिष्ठित समाजाच्या घरात फराळाला प्रारंभ होत नसे. आजही ही प्रथा सुरू आहे.