शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांचा विरोधकांवरील आरोपाला भाजपचे योगेश हळदवणेकर यांचे प्रत्युत्तर

मेहेरनजर की मेहरबानी?
शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांचा निबंध वाचला आणि त्यातील काही मुद्दे कसे सारवले आहेत, त्यावर काही मुद्दे मला नागरिकांपुढे ठेवावे वाटले..या निबंधातून होणार संभ्रम दूर होईल अशी आशा आहे!

बंदरकर – गेली दोन वर्ष रत्नागिरी नगरपालीकेमधील शिवसेनेच्या
सत्तास्थानावर सातत्याने टीका केली जात आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ, लेख शिवसेनेच्या विरोधात लिहून पाठवले जात आहेत.

– गेली ५ वर्षे आपण २ नगराध्यक्ष दिलात. लोकांना नको असताना सुशिक्षित उमेदवार राहुल पंडित यांना आपण घरी बसवलात..आमच्या ऊर्जास्थान असलेल्या भैरीला वेठीस धरलात आणि इथेच टीका करायला वाव दिलात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेली घोडचूक आम्ही शहरवासीय भोगत आहोत. आता टीका पण नको आणि विकासपण करायचा नाही, हे कसं चालेल मित्रा?

बंदरकर – रत्नागिरी नगरपालिका हद्दीतील रस्ते खराब आहेत त्याचा दोष शिवसेनेचे नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यावर लावला जातोय. जेणेकरून एक वेगळी यंत्रणाच विरोधी पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका करण्यासाठी उभी केलेली दिसतेय जी कधी गॅस,पेट्रोल,डिझेल वाढीवर ,महागाईवर बोलताना दिसत नाही.कारण त्यांच्या म्हणण्यानुसार रत्नागिरीकरांना रस्त्याचा त्रास जास्त होतोय कोणत्याही दरवाढीचा नाही.

– मुळात आपण सत्ताधारी आहात, मग आपली नैतिक जबाबदारी आहे की रस्ते, पाणी, वीज यापलीकडचा विकास करणे. आपण आजतागायत रस्ते, डांबर, पाखड्या यात अडकून पडलेला आहात. त्यातून बाहेर या. आता सामान्य नागरिकाने जरी टीका केली तरी आपण विरोधी पक्षावर त्याचे खापर फोडणार, हा फंडा जुना झाला. पुढचा मुद्दा इंधन दरवाढ…तर केंद्र सरकारने दर कमी केला तेव्हा राज्य सरकारने का केला नाही? याचे आत्मपरीक्षण करा कारण राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. रत्नागिरीत राबवित असलेली गॅस योजना ही पण केंद्र सरकारची आहे. त्यामुळे गॅस जर कमी किमतीत मिळाला तर त्याचे श्रेय फक्त लाटू नका.

बंदरकर -गेली दोन वर्ष रत्नागिरी नगरपालिकेच्या माध्यमातून नळपाणी योजनेचे काम सुरू आहे, सीएनजी गॅस पाईप काम सुरू आहे, महावितरणची लाईन टाकण्याचे काम सुरू आहे तसेच जिओ ऑप्टिकल फायबरचे काम हे देखील सुरू आहे. हे सर्व काम सुरू असताना संपूर्ण शहरातील रस्त्यांची खोदाई झालेली आहे त्यात पावसाळा सुरू झाल्यावर रस्त्यामधील खड्ड्यांचा लोकांना खूप त्रास सहन करावा लागला आहे.

– आता तीच तीच कारणे देणे सोडा. कोरोना काळात कामगारांची व्यवस्था करून ही विकासकामे करता आली असती. पण आपण नगराध्यक्ष बदल करण्यात व्यस्त होतात. आता सत्ताधारी म्हणून आपण जी विकासकामे करत आहात म्हणून बोंब करत आहात, त्यात आपले नियोजन किती फसले आहे हे रत्नागिरीकरांना मी सांगायला नको. कोणतीही योजना आली की ती नियोजन बद्ध राबविण्यासाठी सत्ताधारी असतात. खुर्चीवर बसून मोठेपणा मिरविण्यासाठी नसतात हो!

बंदरकर – मुळातच नळपाणी योजनेचे काम सुरू झालं आणि विरोधकांनी नळ पाणी योजनेच्या कामाला हरकत घेतली व त्यावर मा जिल्हाधिकारी यांचे दालनात स्थगिती घेतली.

– स्थगिती का घेतली याची कारणे सांगायला आपण विसरला आहात…ज्या नळपाणी योजना राबविण्यासाठी कोट्यवधीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड जनतेच्या खिशाला बसणार होता, तो वाचावा म्हणून त्या योजनेच्या वाढीव निधीला विरोधकांनी विरोध केला आणि शहर हितासाठी नंतर २ पावले मागे घेतली. त्यातील मधले राजकारण आपण भाजप आणि शिवसेना यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून त्याबाबत एखादी स्वतंत्र पोस्ट करावी…आपण याबाबत अनभिज्ञ आहात, असे दिसते!

बंदरकर – एक वर्षांमध्ये नळपाणी योजनेमधील पाईप च्या किमती अंदाजे 30 टक्क्यांनी वाढली होती,त्यामुळे ती योजना सुरू करण्यासाठी अजून दोन महिने वाढले.

– आता या किमती वाढल्या की वाढविल्या या वादात नको जाऊया…पण त्यानंतर तरी तुम्ही किती नियोजन केलात? आता रस्ते करताय त्यानंतर पुन्हा खोदकाम करता आहात. त्यात परत लिकेज इतकं आहे की आपण त्या पाईपची क्वालिटी तपासून घेतला नाहीत का? किंवा त्या योजनेचे काम इस्टीमेटनुसार नक्की झाले आहे का? योजना राबविली सांगत आहात, मग ती योग्य पद्धतीने राबवलात का?

बंदरकर – सर्व रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या हेतूने रस्त्यांच्या सर्व कामाची वर्कऑर्डर पंधरा मेच्या आधी दिली गेली. 15 मे रोजी तोक्ते वादळ आलं आणि रत्नागिरी शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली ते आत्ता 26 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. आजही हे सांगत असताना डिसेंबर महिन्यात पाऊस पडत आहे आणि हा पाऊस सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाना अढथळा आणत आहे,नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला, त्यांना त्रास होतोय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

– आपला यासाठी आभारी आहे की आपण एकमेव आहात की दिलगिरी व्यक्त केलात…नगराध्यक्ष शहरवासीयांची माफी कधी मागणार? की गृहीत धरून चालले आहेत लोकांना? पाऊस आणि वादळ ही कारणे जुनी झाली. त्याआधीचा काळ काय करत होता. निवडणूक येण्याआधी काम करायची, हा पायंडा का पाडत आहेत? राहुल पंडित यांना पायउतार करण्यापेक्षा त्यांच्याकडून कामे का करून घेतला नाहीत? कुणाची तरी नगराध्यक्षपदाची इच्छा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण शहराला वेठीस का धरताय आपण?

बंदरकर – मुळातच ज्या ठिकाणी नळपाणी योजनेचे काम चालू आहे, त्याठिकाणी नळपाणी योजनेचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत डांबरीकरण करू नये,असा आदेश त्यावेळेचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सरकारने काढला होता..

– म्हणजे आपण विरोधी पक्षाच्या नेत्यांचे इतकेच ऐकला आहात…पारदर्शक कामकाज करा, योजना व्यवस्थित राबवा, शहराचा विकास करा, स्मार्ट सिटी बनवा, हे सल्ले पण ऐका जरा! त्यासाठी youtube ला फडणवीस साहेब यांची भाषणे ऐका…अधेमध्ये भाऊ तोरसेकर पण ऐकलात तरी चालेल!

बंदरकर – शिवसेनेची सत्ता नगरपालिकेत आल्यानंतर संपूर्ण शहरांमध्ये रस्ते ,गटार,स्ट्रीट लाईट,स्वच्छता अभियानाची कामे मार्गी लागली.

– आपला हा दावा फोल आहे. मुळात गटार व्यवस्था आपल्याकडे आहे का? मग रामआळीत पाणी का भरलं? स्ट्रीटलाईट, रस्ते इतकाच विकास असतो का? गटार आणि रस्ते ठेके कुणी मिळवले? ते पण सांगा आम्हा पामरांना! स्वच्छता अभियान फक्त बक्षीस मिळविण्यासाठी राबवत होता का? आजही मी असे अनेक कोपरे दाखवतो, जिथे कचरा, सांडपाणी आहे.

बंदरकर – वंदनिय बाळासाहेब ठाकरे तारांगणचे काम पूर्णत्वास आले आहे. शहरातील आवश्यक ठिकाणी गार्डन्स तयार करण्यात आली आहेत. रत्नागिरी शहराला ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो तो फिल्टरेशन प्लांट अद्यावयात करण्यात आला आहे.

– आमचे स्फूर्तीस्थान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आणि त्यांच्या नातवाच्या हस्ते भूमिपूजन केलेल्या तारांगणचा डोम लिकेज आहे, त्याचे काम करण्यास इतकी वर्षे का लागतात? मुळात ज्या तारांगणला माझ्या वंदनीय बाळासाहेबांचे नाव देण्यात आले, ते तरी काम वेळेत आणि दर्जेदार केला असता, तर बाकी सगळ्या गोष्टी आम्ही विसरलो असतो. किमान त्या नावाची तरी भीती बाळगा! गार्डन्सची अवस्था काय आहे, इस्टीमेटनुसार काम झालेले नाही, हे पण पहा! आता फिल्टरेशन प्लांटबद्दल आपल्याला धन्यवाद!

बंदरकर – माननीय नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून इंजिनिअरिंगचे डिग्री कॉलेज सुरू होतं आहे कवी कालिदास संस्कृत महाविद्यालय हे सुरू झालं. फार्मसीचे कॉलेज सुरू झालं आणि नुसते रस्ते गटार पाणी यावर भर न देता सर्वांगीण विकासावर भर देत रत्नागिरीचा विद्यार्थी शैक्षणिक सुदृढ व्हायला पाहिजे या दृष्टीने रत्नागिरी शैक्षणिक हब होण्यासाठी उदयजी सामंत हे प्रयत्नशील आहेत. मेडिकल कॉलेज प्रस्ताव देखील शासन स्तरावर असून तो मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

– आमची टीका ही शहर विकासाबद्दल आहे. नगराध्यक्ष आणि सत्ताधारी नगरसेवक काय करतात? योजना का फसल्या? यावरची टीका आहे. मुळात उदयजी सामंत यांनी ही जी कामे केली, असे तुम्ही म्हणता, त्यामुळे ते निवडून येत आहेत. पण शहरातील कामांसाठी त्यांनाच पत्रकार परिषद घ्यायला लावू नका हो! नगराध्यक्ष कमी बोलतात आणि सगळा भार आपण आमच्या आमदारांवर का बरं देत आहात? आपण सांगितलेली कामे पूर्ण होवोत, हीच शुभेच्छा!

आणि हो…प्रत्येक वेळेला जनतेला गृहीत धरू नका! जनता अंगार है…हेही लक्षात असू द्या…आपल्यावर मित्र म्हणून प्रेम आहेच…ते वृद्धिंगत होवो!

आपला हितचिंतक मित्र,
योगेश हळदवणेकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button