
जिल्ह्यात येणार भगवी लाट,महायुतीचे उमेदवार विजयी होणार- अॅड. दीपक पटवर्धन
पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांना विराजमान करण्याकरिता महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले पाहिजे. याकरिता जास्तीत जास्त मतदान करून घेण्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभाग, गावागावांत योगदान दिले आहे. शिवसेनेसोबत मिळते जुळते घेऊन प्रत्येक बूथवर भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले. संपूर्ण जिल्ह्यात भगवी लाट येईल, महायुतीचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतील, असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केला.अॅड. पटवर्धन यांनी सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी शहरातील महायुतीच्या सर्व बूथवर कार्यकर्ते, पदाधिकार्यांच्या भेटी घेतल्या. या वेळी महायुतीचे उमेदवार व आमदार उदय सामंत हेदेखील उपस्थित होते. अॅड. पटवर्धन यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, रत्नागिरीत महायुतीचे चांगले समीकरण जुळले आहे. काल पडलेल्या वादळी पावसामुळे आज मतदानावर सावट होते. त्यामुळे सकाळपासूनच मतदानासाठी मतदारराजाला घरातून बाहेर काढण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे.आज रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांमध्ये मी स्वतः दौरा केला. तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनी नेटाने प्रचारात सक्रिय भाग घेतला. आज मतदारांना घरातून मतदान केंद्रापर्यंत नेण्याकरिता मदत केली. विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग आणि महिलांना सहकार्य केले. बूथवर शिवसेनेसोबत भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी मतदानाचा हक्क बजावून जास्तीत जास्त लोकांना मतदान करण्यासाठी प्रयत्न केले. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होणार असून रत्नागिरीत मतदानाची टक्केवारी वाढती असून यामुळे उदय सामंत सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, असा दावाही अॅड. पटवर्धन यांनी केला.
www.konkantoday.com