कोकणातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा बदल्यांचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. यात सर्व जिल्हा परिषदांचा समावेश होणार आहे. 10 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रिक्त पदाच्या सबबीखाली कोणतीही जिल्हा परिषद आता बदली प्रक्रियेतून वगळू नये, असे निर्देश ग्रामविकास विभागाने बदली सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीला दिले आहेत. यामुळे कोकणातील बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने सात एप्रिल 2021रोजी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे नवीन धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी बदलीचे ॲप्लिकेशन तयार करण्याचे कंत्राट विंसिस कंपनीला दिले आहे. सन 2021 च्या बदली धोरणातील कलम 2.8 नुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदाची टक्केवारी 10 टक्के पेक्षा अधिक आहे अशा जिल्हा परिषदेमधून शिक्षकाला आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीमुळे कोकण विभागात कार्यरत असलेल्या शिक्षकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर इ. जिल्हा परिषदांमध्ये सातत्याने 10 टक्केपेक्षा अधिक रिक्त पदे कायम राहत असल्याने येथील शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्यास अडचणी निर्माण होत होत्या. कोकण विभागात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीमध्ये न्याय मिळावा यासाठी खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने राज्य अध्यक्ष गोविंद सोळुंके पाटील, राज्यनेते सनिदेवल जाधव , कार्याध्यक्ष शेषराव बिरादार व राज्यकोषाध्यक्ष सत्यनारायण साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली 22 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर तीन दिवस आंदोलन केले होते. या आंदोलनास प्रतिसाद म्हणून ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी कोकण विभागाचा समावेश करण्याबाबत आश्वासन दिले होते. कोकण विभागाचा आता बदली प्रक्रियेमध्ये समावेश होत असल्यामुळे ग्रामविकास मंत्र्याचे सर्व शिक्षकांमधून आभार व्यक्त केले जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छूक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. 1 हजार 200 शिक्षक या बदलीसाठी पात्र आहेत. 10 टक्के रिक्त जागा ठेवूनच या बदल्या होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button