
राज्यात महापालिका स्तरावर प्रादेशिक परिवहन कार्यालय; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा!
भाईंदर : राज्याच्या परिवहन कार्यालयावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी जिल्ह्याऐवजी महापालिका स्तरावर स्वतंत्र प्रादेशिक परिवहन केंद्र उभारले जाणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी ही घोषणा केली. राज्यात जवळपास ५७ प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि ८ उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या कार्यालयात शिकाऊ तसेच कायमस्वरूपी अनुज्ञप्ती (लायसन्स) आणि परवाना (परमिट) काढणे, त्यांचे नूतनीकरण करणे यासह वाहनांशी संबंधित विविध प्रकारची कामे केली जातात. राज्यात जिल्हा स्तरावर प्रादेशिक परिवहन केंद्र कार्यरत आहेत.*काही ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन केंद्रे उभारण्यात आली आहेत. मात्र कामाचा आवाका प्रचंड असतो.
महानगरपालिका क्षेत्रात काम सर्वाधिक कामे असल्यामुळे त्याचा ताण परिवहन विभागाच्या कामकाजावर होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी परिवहन आयुक्त विवेक भीमनवर आणि परिवहन अधिकाऱ्यांची बैठक आयोजिक केली होती. या बैठकीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील महापालिका स्तरावर स्वतंत्र कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काही दिवसांत याबाबतचा शासननिर्णय प्रसिद्ध केला जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातीरल सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयात अत्याधुनिक यंत्रणा उभारून संगणकीय प्रणालीवर परवाने देण्यात येतील, अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी दिली.
महापालिका स्तरावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाची उभारणी करण्याच्या घोषणेनंतर भाईंदरच्या उत्तन येथे परिवहन कार्यालय सुरू करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेली अडीच एकर (९ हजार ७०० चौरसमीटर ) इतकी जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेचा ताबा त्वरित प्रादेशिक परिवहन विभागाकडे देण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अतिरिक्त तहसीलदार नीलेश गौड यांना दिले आहेत.