
कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न देणाऱ्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव , जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीकडे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाचा कानाडोळा!
गेल्या दिड वर्षात सतत पाठपुरावा करणारी निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबुकवरही संघटना, कायम कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत असते. गतवर्षीचे आणि यावर्षीचे वार्षिक उत्पन्न दाखवून ही डोळेझाक का? असा प्रश्न विचारला जातो आहे.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील २०२३-२०२४ चे वार्षिक उत्पन्न हे ५ कोटी ३७ लाख ९७ हजार ७८७ रुपये एवढे होते. १ एप्रिल २०२४- मार्च २०२५ यावर्षीचे उत्पन्न ५ कोटी ८५ लाख १३ हजार ६४६ रुपयांची विक्रमी वाढ झाली. दररोजच्या प्रवाशांची संख्येत वाढ होते आहे. ही बाब कोकण रेल्वेच्या फायद्याची की तोट्याची? मग प्रवाशांच्या सुविधेकडे का पाठ फिरवली जाते?संगमेश्वर रेल्वे स्थानकातून काही अंतरावर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या छावा या हिंदी चित्रपटाने हे स्मारकस्थळ बहुचर्चित झाले आहे. पर्यटकांची झुंबड संगमेश्वर येथे दाखल होते.त्यात रेल्वेचा प्रवास केलेले पर्यटक पुन्हा रेल्वे प्रवास नको! असा नाराजीचा सूर आळवितात.
कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक होणार यासाठी निधी पुरवला जाणार!पर्यटनाला वाव मिळणार! गोवा,केरळ याच धर्तीवर आपल्या संगमेश्वराकडेही पर्यटकआकर्षित होणार! हे खरे असले तरी आताचा कोकण रेल्वेचा प्रवास हा खच्चून भरलेल्या कोंबड्या बकऱ्यांसारखा करावा लागतो आहे. मग या स्थानकांवर मडगाव , जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसला थांबा देऊन हा प्रवाशी भार नक्कीच हलका करता येईल! हाच विचार ध्यानात ठेऊन स्थानिक लोकप्रतिनिधींनी, जनसामान्यांनी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात राजधानी एक्सप्रेस अडवून निषेध नोंदविण्याचा विचार केला. तसे निवेदन कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिले. त्या पत्राचीही म्हणावी तशी दखल घेतली नाही.आमदार शेखर निकम, खासदार नारायण राणे यांच्यासज्ञ काही राजकीय नेत्यांनी आपापली पत्रे कोकण रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला दिली. पण अद्याप सुस्त यंत्रणा वेग धरीत नाही.संगमेश्वर तालुक्यातील जनसामान्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका! केवळ राजकीय पोळी, श्रेय लाटण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची पोकळ अस्मिता दाखवू नका. खरोखरच संगमेश्वर तालुक्यात जगविख्यात स्मारक उभारायचे असेल तर या मातीचे ऐतिहासिक महत्व ध्यानात घ्यावे. केरळ, गोवा, या राज्यांतील पर्यटनाला गतिमान करण्याच्या नादात संगमेश्वरच्या ऐतिहासिक महत्त्वाला कमी लेखू नका! असा इशारा देण्यात आला आहे