
केवळ घोषणा न करता संवेदनशीलता दाखवून घोसाळकर कुटुंबियांना मदत करावी- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
खेड : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे महावितरणची वाहिनी तुटून बोरज गावातील पतिपत्नीचा मृत्यू झाला.घोसाळकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अश्या कुटुंबाला केवळ मदतीची घोषणा न करता सवेंदनशीलता दाखवून त्याच्या आय टी आय असलेल्या मुलाला महावितरणमध्ये नोकरी मिळावी अशी मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी आज मृत प्रकाश घोसाळकर यांच्या बोरज घोसाळकरवाडी येथील घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
या वेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काल मी रायगड तालुक्याचा दौरा केला. या तालुक्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलादपूर येथे तर गेल्या वर्षाच्या निसर्ग वादळात छप्पर उडालेल्या शाळेची अद्याप दुरुस्ती झालेली नाही, अनेक नुकसानग्रस्त शेकऱ्याना मदतही मिळालेली नाही. शासनाने केवळ मदतीची घोषणा न करता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलता दाखवून मदत द्यायला हवी.
पत्रकारांनी त्यांना आंबा नुकसानीबाबत विचारले असता ते म्हणाले गेल्या वर्षी आणि या वर्षीही आंबा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची मला कल्पना आहे. आंबा व्यावसायिकांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com