रत्नागिरी नगर परिषदेमधील सत्ताधार्‍यांचा मनमानी कारभार, शहरातील ८० टक्के रस्ते खड्ड्यात: विरोधकांचा आरोप

रत्नागिरी ः रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधार्‍यांच्या मनमानी कारभाराचा फटका जनतेला बसत असून यांच्या कारभारामुळेच शहरातील ८० टक्के रस्ते खड्ड्यात गेल्याचा आरोप शहर विकास आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. नगर परिषद कारभारावर नियोजनशून्य कारभाराचा पंचनामा शहर विकास आघाडीच्यावतीने करण्यात आला असून या बाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तसेच रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांना दिले आहे.
शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद कीर व सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने या अधिकार्‍यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी सत्ताधार्‍यांच्या कारभारामुळे शहरातील रस्त्यांची कामे दर्जाहीन झाली असल्याचा आरोप केला आहे. सध्या रस्त्यात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकाला नाहक त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याच्या दर्जाहीन कामाला रस्ते खराब होण्यास ठेकेदार जबाबदार आहे. व रस्ते केल्यानंतर त्याच्या देखभालीच्या कालावधीमध्ये रस्ते नादुरूस्त झाले आहेत. तरी देखील दुरूस्तीचे काम ठेकेदाराऐवजी पालिका करत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. सत्ताधारी ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. सिंगल लेअर रस्ते करून लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक समोर आल्याने ऐन पावसाळ्यात डांबरीकरण करण्यात आले. यामुळे काही महिन्यातच रस्त्याला खड्डे पडले असून सत्ताधारी हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत असल्याचाही आरोप यावेळी निवेदनात करण्यात आला आहे.
ईद व गणपती सण जवळ येत असल्याने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशीही या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष निलेश भोसले, मनसेचे छोटू खामकर, मनु गुरव, बसपचे अनिकेत पवार आदीजण उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button