विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांची अवहेलना थांबवून ही कौटुंबिक संपत्ती आदरपूर्वक जपावी सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे यांचे आवाहन

* रत्नागिरी प्रतिनिधी : विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील मुला बाळांना असलेला ज्येष्ठांचा आधार तुटला असून ज्येष्ठांच्या छळाचाही उद्रेक वाढला आहे. पाल्यांनी उतारवयात ज्येष्ठ नागरिकांना एकटे न टाकता ही संपत्ती आदरपूर्वक जपण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती श्रद्धा कळंबटे यांनी केले. कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने येथील जेष्ठ नागरिक भवनात 15 जून हा ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक अवहेलना प्रतिबंधक अधिनियम 2007 मधील कायद्यांच्या तरतुदीची माहिती पोलीस खात्याच्या प्रतिनिधी श्रीमती सानिका कांबळे यांनी दिली. ज्येष्ठांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर होणारे हल्ले ही चिंतेची बाब असून ते थांबण्यासाठी पोलीस खाते निश्चित मदतीचा हात देईल, असे सांगून यांनी आपल्या ज्येष्ठांनी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १०९० अथवा क्रमांक 100 अथवा 1 12 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्रीमती कळंबटे म्हणाल्या, वृद्धापकाळातील गरजा लक्षात घेऊन आपल्या हयातीत मालमत्तेचे हस्तांतर करण्याचे ज्येष्ठ नागरिकांनी कटाक्षाने टाळावे. आवश्यक तर कायदेशीर इच्छापत्र करून कुटुंबातील भावी वाद टाळण्यासाठी दक्ष रहावे, असे सांगताना अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा अभावी ज्येष्ठांची विभक्त कुटुंबात आबाळ होऊन त्यांनावृद्धाश्रमाचा आधार घेण्याची वेळ मुलानी आई-वडिलांवर येऊ देऊ नये, असे कळकळीचे आवाहन श्रीमती कळंबटे यांनी केले. वारसांकडून छळ होत असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात प्रकरण नोंदवून कायदेशीर न्याय मिळविता येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित जेष्ठानी विचारलेल्या शंकांचे निरसन श्रीमती श्रद्धा कळंबटे आणि श्रीमती सानिका कांबळे यांनी केले. जेष्ठाविषयी आपण सदैव आदरपूर्वक तत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी संघाचे पदसिद्ध मार्गदर्शक श्री. श्यामसुंदर सावंत देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी ज्येष्ठ नागरिक संघ राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. शेवटी श्री. वसंतराव पटवर्धन यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने या जनजागृती मेळाव्याची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button