
नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थक हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
नाणार येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प व्हावा याच्या समर्थनार्थ आज निघालेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद लाभला .हजारोंच्या संख्येने यामध्ये नागरिक सहभागी झाले होते यामध्ये शेतकरी,महिला ,तरुण ,नाणार ग्रामस्थ , उद्योजक, व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. याशिवाय अनेक संस्थांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला होता. त्यांचे सभासदही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
हा प्रकल्प ज्या भागात होणार आहे त्या नाणार परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ देखील या समर्थन मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय राजापूर लांजा रत्नागिरी या भागातील ग्रामस्थ व्यापारी तरुण देखील या मोर्चासाठी आले होते.
चला असत्याकडून सत्याकडे ,आता नाही तर कधीच नाही असे फलक घेऊन व घोषणा देत या मोर्चाला मारुती मंदिर येथून सुरुवात झाली. हा मोर्चा माळनाका सिव्हिल हॉस्पिटल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या ठिकाणी हजारो मोर्चेकरी एकत्र आले त्यानंतर प्रकल्प समर्थकांच्या वतीने उप-जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. या प्रकल्पामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार असून स्थानिक शेतकरी देखील या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. त्यामुळे नाणार येथे हा प्रकल्प व्हावा अशी जनतेची भावना आहे. ही भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावी व मुख्यमंत्र्यांकडे आमचे म्हणणे मांडण्याची संधी मिळावी अशी विनंती शिष्टमंडळाने केली.
हा मोर्चा शांततेत निघावा यासाठी पोलिसांनी अनेक अटी घातल्या त्या अटींचे पालन करून हा मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला . कोकण विकास समितीने नाणार रीफायनरी समर्थनासाठी हे आंदोलन उभे केले होते त्याला सर्वस्तरावरून प्रतिसाद मिळाला त्यामुळे कोकणात चांगले उद्योग यावेत असे जनतेलाही वाटत असल्याचे सिद्ध झाले.
आज नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा काढणारे सर्वजण दलाल असल्याचा आरोप नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी केला आहे त्यामुळे सामान्य जनतेने या मोर्चात सहभागी होऊ नये हे त्यांनी केलेले आवाहन जनतेने धुडकावल्याचे समर्थन मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले.
www.konkantoday.com