
तिवरे धरण दुर्घटना ८ मृतदेह सापडले, धरण दुरूस्त केल्याचा अधिकार्यांचा दावा, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या २५ जणांपैकी ८ जणांचे मृतदेह सापडले आहेत. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारणमंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी दिले आहेत.
दरम्याने उर्वरित बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफची पथके आता घटनास्थळी दाखल झाली असून त्यांचेमार्फत शोध सुरू आहे. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी अनेक घरातील लोकं जेवायला बसली होती. त्यामुळे अचानक धरण फुटल्यामुळे या लोकांना सुरक्षित जागी जाता आले नाही. पाण्याचा लोंढा आल्यामुळे हे लोक वाहून गेले. पाण्याच्या लोंढ्याला मोठा झोत असल्याने हे लोक लांब अंतरापर्यंत वाहून गेले असल्याची शक्यता असून त्या दृष्टीने शोध सुरू करण्यात आला आहे. उर्वरित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले. जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी हे धरण काही वर्षापूर्वी बांधलेले असून ते नेमके कशामुळे फुटले याची चौकशी केली जाईल. त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल असे सांगितले.
दरम्याने ग्रामस्थांनी या धरणाबाबत वारंवार तक्रारी केलल्या होत्या. त्याप्रमाणे संबंधित अधिकार्यांकडे चौकशी केली असता त्यांनी मे महिन्यात या धरणाची दुरूस्ती केली असल्याचे सांगितले आहे. तरी देखील ही दुरूस्ती योग्य रितीने झाली की नाही हे पाहिले जाईल. यात अधिकारी दोषी आढळले तर त्यांचेवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
दरम्याने चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांनी देखील या धरणाबाबत ग्रामस्थांनी आपल्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याप्रमाणे आपण संबंधित खात्याकडे याबाबत पाठपुरावा देखील केला होता. संबंधित खात्याने या धरणाची दुरूस्ती केली असल्याचे आपल्याला कळविले होते परंतु त्यांनी केलेली ही दुरूस्ती योग्य रितीने व व्यवस्थित झाली नसल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे असेही त्यांनी सांगितले.