
रत्नागिरी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार
रत्नागिरी ः दिवसभर विश्रांती घेऊन रविवारी सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. गेले पाच दिवस रत्नागिरी जिल्हा पावसाळला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
लांजा तालुक्यातील भडे ययेथे रोहिणी चंद्रकांत सुर्वे यांच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले.मंडणगड तालुक्यात राजेश्री मोहिते यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले.दापोली तालुक्यात आसूद येथे रवींद्र बेनेरे आणि कुंभवे येथे दीपक कुळे यांच्या घराचे नुकसान झाले. वाकवली येथे जिल्हापरिषदेच्या सार्वजनिक विहीरीवर झाड कोसळून ७ लाख २ हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले. चिपळूण तालुक्यात पाटवन मराठेवाडी येथील सार्वजनिक विहीरीवर झाड पडून नुकसान झाले. मादवली येथे रामचंद्र जलगावकर आणि शिरगाव येथील चंद्रकांत शिंदे, चिंचखरी येथे दत्ताराम वासकर यांच्या घराचे नुकसान झाले. पिंपळी येथे विजय काजवे, मंगेश भोगले, अशोक वारंवार यांच्या दुकानात पाणी शिरून नुकसान झाले आहे.गुहागर तालुक्यात पालशेत येथे संतोष करजकर, सुरेश काळे यांच्या घराचे नुकसान झाले.