
जीवरक्षकांनी काम थांबविल्याने समुद्रकिनार्यावर येणार्या पर्यटकांची सुरक्षितता धोक्यात
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक समुद्र किनार्यांचे पर्यटकांना आकर्षण असून सुट्टीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. परंतु येणार्या पर्यटकांना समुद्रातील खोलीचा अंदाज न आल्याने किनार्यावर पर्यटकांचे बुडण्याचे अनेक प्रकार घडले होते. त्यामुळे शासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना अंमलात आणली होती. त्याचाच एक भाग म्हणून समुद्रात बुडणार्या पर्यटकांना वाचविण्यासाठी जीवरक्षक नेमण्यात आले होते. या जीवरक्षकांची नेमणूक स्थानिक पातळीवरून करण्यात आल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला होता. या योजनेचा फायदा झाला होता व बुडणार्या अनेक पर्यटकांना या जीवरक्षकांनी वाचविले होते. पर्यटकांचा जीव वाचविणार्या या जीवरक्षकांना मानधन कुणी द्यायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मे महिन्यानंतर मानधन दिल्यानंतर जीवरक्षकांना नोकरीतून ब्रेक देण्यात आला आहे. गणपतीपुळे व अन्य समुद्रावर अशा प्रकारे जीवरक्षक नेमले होते. परंतु मानधनाच्या वादामुळे आता जूनपासून जीवरक्षकांनी काम करण्याचे थांबवले असून आता पर्यटकांची सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.