राजापुरच्या प्रसिद्ध गंगामाईचे निर्गमन
राजापूर ः असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईने निर्गमनाचे संकेत दिले आहेत. एप्रिल महिन्याच्या अखेरीस आगमन झाल्यानंतर सुमारे ५८ दिवस गंगामाई अखंडीतपणे प्रवाहीत होती. मात्र शुक्रवारी गोमुखातून वाहणारे पाणी बंद झाले आहे. तर मुळगंगेचा प्रवाह देखील कमी झाला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर गंगेचा प्रवाह कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिध्द असलेल्या राजापूरातील उन्हाळे येथील गंगेचे २५ एप्रिल २०१९ रोजी आगमन झाले होते. राजापूर तालुक्यात सर्वत्र पाण्याचा ठणठणाट असताना गंगाक्षेत्रातील सर्व कुंडांमध्ये पाणी अखंडीत वाहत होते. ऐन उन्हाळी हंगामाच्या सुट्टीत गंगामाईचे आगमन झाल्याने गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान करण्यासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी होत होती. त्यामुळे गेले दोन महिने गंगाक्षेत्र भाविकांनी फुलून गेले होते. गंगा आगमनाच्या काळात पाऊस लांबतो असा आजवरचा अनुभव आहे. त्यानुसार यावर्षी पाऊसाचे आगमनही लांबले आहे.
बुधवारी राजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांनी गंगेचा प्रवाह कमी झाला आहे. काशीकुंडातील पाणी कमी झाल्याने गोमुखातून वाहणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. तर मुळ गंगेचा प्रवाहही कमी झाला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजल्यापासून गोमुखातून वाहणारे पाणी बंद झाल्याचे गंगापूत्र श्रीकांत घुगरे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे एकप्रकारे गंगामाईने निर्गमनाचे संकेत दिले आहेत.