
१ ते ४ हजार लोकसंख्या असलेल्या गावांत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा.
महाराष्ट्र हे देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे. उद्योग धंद्यापासून ते शेती, सेवा क्षेत्र व आरोग्य सुविधा यामध्ये राज्य अग्रेसर आहे. पायाभूत सुविधांचा विकास देशात सर्वाधिक महाराष्ट्रामध्येच आहे.कुठल्याही क्षेत्रात सेकंड टू नन नसलेल्या महाराष्ट्राला अधिकाधिक उत्तम राज्य बनवण्याची ग्वाही देत विरोधकांनी राज्यकारभारासाठी आपल्याकडील चांगल्या सूचना देण्याची अपेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
राज्यात ग्रामीण भागातील १ ते ४ हजार लोकसंख्या असलेल्या गावांत १४ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्यात येतील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून गावांना जोडणारे रस्ते यापुढे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. राज्यात ग्रामीण भागातील १४ हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. तसेच १ हजार लोकसंख्या असलेल्या सुमारे ४ हजार गावांमध्ये सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्प राबवण्यात येईल. न्यू डेव्हलपमेंट बँकेला याबाबत अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यावर निश्चितच सकारात्मक निर्णय होणार आहे.