
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील चार वर्षात ५७५ जणांची तंबाखू सेवन मुक्ती
रत्नागिरी ः राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील चार वर्षात ५७५ जणांची तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थापासून सोडवणूक करण्यात आली. तंबाखूचे व्यसन असलेल्या १७ हजार ८५१ जणांचे चार वर्षात समुपदेशन करण्यात आले.
३१ मे हा दिवस दरवर्षी जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तंबाखूच्या सेवनामुळे बरेच असंसर्गजन्य रोग निर्माण होतात. उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व शरीराच्या विविध अवयवांना होणारा कर्करोग इत्यादी. सध्या दर वर्षी ६० लक्ष लोक तंबाखूच्या सेवनाने मृत होतात. तर ही संख्या सन २०३० पर्यंत ८० लक्षापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सन २००४ च्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू हा तंबाखूच्या सेवनामुळे होणार्या आजारामुळे होतो.