सावरकरांच्या स्मृतीवर रत्नागिरीचा पर्यटन विकास
रत्नागिरी ः स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतीकारक स्वा. सावरकर यांचे रत्नागिरीशी अतूटनाते आहे. ब्रिटीशांनी स्वा. सावरकरांना विशेष कारागृहात ठेवले होते. त्यानंतर रत्नागिरीतच त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. या कालावधीत स्वा. सावरकर यांनी समाजपरिवर्तनासह केलेल्या कार्याची माहिती रत्नागिरीकरांसह पर्यटकांना मिळावी यासाठी सावरकर स्मृती पर्यटन संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी पतितपावन मंदिर संस्था आणि अखिल हिंदू गणेशोत्सव मंडळ यांनी पुढाकार घेतला आहे.
स्वा. सावरकरांच्या संकल्पनेतून आणि भागोजीशेठ कीर यांच्या देणगीतून भारतातील पहिले समाजमदिर पतितपावन मंदिर उभे राहिले. या मंदिराच्या शेजारी सावरकर स्मारक असून क्रांतीकारकांची छायाचित्रे, ३५० व्यक्तींच्या हातांचे ठसे, सावरकरांचा चष्मा, जांबिया पुस्तकातून पाठविलेले रिव्हॉल्वर जतन करून ठेवण्यात आले आहे.
सावरकरांशी निगडीत असलेली पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी गाईड तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी अभ्यासवर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पतितपावन मंदिराचे ऍड. बाबा परूळेकर यांनी दिली. त्यामुळे येथील तरूणांना रोजगार मिळणार आहेत. त्याचबरोबर भगवती किल्ला, थिबा राजवाडा यासह रत्नागिरीतील पर्यटनस्थळेही पर्यटकांना पाहता यावीत, त्याची ऐतिहासिक माहिती या गाईडमार्फत देण्यात येणार आहे. त्यामुळे येथील रूग्णांना रोजगाराचे साधनही मिळणार असून पर्यटनातही वाढ होणार आहे.