
आंबा घाटात दरड कोसळली; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
संगमेश्वर : तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दख्खन जवळ आज (१८ ऑगस्ट) सकाळी पुन्हा दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूंनी पाच यंत्राच्या सहाय्याने दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे; मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दरड बाजूला हटविण्याच्या कामात अडथळा येत आहे.
गेले चार पाच दिवस पावसाने रुद्ररूप धारण केल्यामुळे त्यातच महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कटाई करण्यात आलेल्या डोंगरामुळे राहिलेल्या डोंगराचा भाग सतत कोसळत असल्याने वाहतूकदार धास्तावले आहेत. त्यातच वाहतूक कोंडी होत आहे. तहसीदार व पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
