
चौपदरीकरणावरील रेंगाळलेल्या १४ पुलांंचे काम मार्गी लागणार
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील १४ पुलांच्या कामांचा प्रश्न आता मोकळा झाला आहे. नुकतेच या पुलांचे काम त्या त्या भागातील ठेकेदारांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच जुने ठेकेदार व नव्या ठेकेदारांमार्फत संयुक्त पाहणी करून तातडीने या पुलांच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे या पुलांच्या कामाला गती येण्याची शक्यता आहे.
चौपदरीकरणातील पनवेल ते झाराप दरम्यानच्या ब्रिटीशकालीन पुलांच्या ठिकाणी नवीन पुल उभारणीसाठी स्वतंत्र ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र संबंधित ठेकेदारांनी काम अर्धवट स्थितीत ठेवूनच अचानक काम थांबवले होते. तसेच तितक्याच तातडीने काम सोडण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर या कामासंबंधी दोनवेळा निविदा राबविण्यात आली. मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चौपदरीकरण करणार्या कंपन्यांकडेच पुलाचे काम वर्ग करण्यात आले आहे.