
पाणीटंचाईमुळे राजीवडा ग्रामस्थ पालिकेवर धडकले
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळ धरणात पाणी उपलब्ध असूनही शहरात मात्र अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शहरातील राजिवडा भागात गेले दोन दिवस पाणी न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट नगर परिषदेवर धडक मारली. रत्नागिरी शहरात सध्या पाणी वितरणात गोंधळ असून अनेक भागात व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही.वेगवेगळ्या कारणास्तव रस्त्याच्या बाजूला खोदाई झाली असून विभागात पाण्याचे पाइप फुटल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाई जाणवत आहे.गेल्या दोन दिवसांपासून राजीवडा भागात चाळीस कुटुंबांना पाणीपुरवठा झाला नाही राजीवडा भागातील रस्ते अरुंद असल्याने तेथे टँकर पाठविणे कठीण होऊन बसले आहे.दोन दिवस पाणी न आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट पालिकेवर धडक मारून पाणी सभापतींना घेराव घालून आपली मागणी मांडली.