
लाखो शेतकऱ्यांची मुंबईच्या दिशेने कूच, मंत्रालयावर उद्या धडकणार विशाल मोर्चा, मागण्या काय?
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मुंबई मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहेत. लाखो शेतकऱ्यांनी आधीच मुंबईच्या दिशेन कूच केली आहे. उद्या 12 फेब्रुवारी रोजी मुंबईतील मंत्रालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे. यात राज्यभरातील शेतकरी सहभागी होणार आहेत.
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नेते सतीश इढोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, वीजबिल माफी, शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा यांसह विविध मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. मात्र या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांनी आता थेट मुंबईतील मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे. उद्या 12 फेब्रुवारी रोजी हजारो शेतकरी मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहेत. यात राज्यभरातील शेतकरी यात सहभागी होणार असल्याचं शेतकरी नेते सतीश इढोळे यांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल विविध आंदोलन करण्यात आले. उपोषण, रास्ता रोको, आत्महत्येच्या धमक्या आणि अवयव विक्रीसारख्या टोकाच्या पद्धतींचा अवलंब करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या संदर्भात शेतकरी नेते सतीश इढोळे, बालाजी मोरे आणि विशाल गोटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या:-
पिकविमा मिळायला हवा* कर्जमाफी करा* वीजबील माफ करा* शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा