रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे निरुळच्या चाकरमान्याला लुटणाऱ्या दोघांना सांगलीतून अटक; अन्य दोघांचा शोध सुरू

रत्नागिरी : रेल्वेतून उतरल्यानंतर गावी जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्यात आले. याबाबतची फिर्याद निरुळ तेलीवाडी येथील सुरेश रसाळ (65) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी दोघांना सांगली येथून ताब्यात घेतले आहे. तर दोघेजण अद्याप फरार आहेत.
मोहमद आसिफ आरिफ अन्सारी (वय 35, म्हेसाना, गुजरात), रफिक अन्सारी (42, उस्मानाबाद, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र हे दोघे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर येत आहे. त्यांच्याकडून दीड लाखाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली. तर फरार झालेले इम्रान व शादाब अशा दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रसाळ हे 18 ऑक्टोबर रोजी पत्नीसह मुंबईतून रेल्वेने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आले. यावेळी आसिफ आणि रफीक यांनी आपण कुठे जाणार? अशी विचारणा केली. रसाळ यांनी पावस -निरुळ येथे जाणार असल्याचे सांगितले. त्यावर चौघांनी आम्ही तुम्हाला पावस एसटी स्टॅण्डपर्यंत सोडू असे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रसाळ हे पत्नीसह टाटा सफारी कारमध्ये बसले. मात्र कारमध्ये अन्य दोन संशयित शादाब, इम्रान आधीपासून बसलेले होते. रसाळ यांनी आपल्या बॅग गाडीच्या मागच्या सीटवर ठेवल्या. सकाळी 7 वा. च्या सुमारास गाडी पावस स्टॅण्डजवळ आली असता रसाळ व त्यांची पत्नी कारमधून उतरले. यावेळी त्यांनी बॅगेची तपासणी केली असता 1 लाख 20 हजार रुपयांचा सोन्याचा हार, 40 हजार रुपये किमतीची चेन, अंगठी, सोन्याची बांगडी व 50 हजार रुपये रोख रक्कम असा दीड लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले.
रसाळ यांनी तत्काळ पूर्णगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस घटनेचा तपास करत होते. दरम्यान सांगली येथे दोन चोरट्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पूर्णगड पोलिसांना मिळाली होती. पूर्णगड पोलिसांनी सांगलीतील पोलिसांशी संपर्क साधला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button