आजवर कोकणी माणसाने शिवसेनेला जसे भरभरुन दिले, तशाच प्रकारे आगामी निवडणुकीत येथील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील,-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, ठाणे शिवसेनेचे शरीर आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही शिवसेनेची फुप्फुसे आहेत. आजवर कोकणी माणसाने शिवसेनेला जसे भरभरुन दिले, तशाच प्रकारे आगामी निवडणुकीत येथील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
राजापुरात आज (दि.८) शिवसेनेने शिवसंकल्प अभियान आयोजित केले होते. ‘मिशन ४६, शिवसंकल्प ध्येय भगवा महाराष्ट्राचे’ अशी शिवसेनेची संकल्प यात्रा सुरु झाली आहे. येथील राजीव गांधी मैदानात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठी सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार रविंद्र पाठक, माजी आमदार सदानंद चव्हाण, उद्योजक किरण सामंत, माजी महापौर मोरे, शशिकांत चव्हाण, उपनेत्या मिनाताई कांबळे, शितल म्हात्रे, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, सिंधुदुर्गचे जिल्हा प्रमुख संजय आगट आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. त्याचा चांगला फायदा राज्याला झाला. केंद्रातील सरकार आम्हाला भरभरुन निधी देत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल, तर राज्यात महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी केवळ ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ याव्यतिरिक्त काहीही केले नाही. मात्र, आपण सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनता हेच आपले कुटुंब या धोरणातून झपाटून काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com