
रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन
रत्नागिरी : बुद्धगया मुक्ती चळवळीसाठी १९४९ च्या कायद्यात सुधारणा आणि व्यवस्थापन समितीत बौद्धांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ, मुंबई यांच्या वतीने आज (९ एप्रिल) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.प्रत्येक धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन त्या धर्माच्या अनुयायांच्या हाती असावे, हा एक स्थिर सिद्धांत आहे.
त्यामुळे बुद्धगया महाविहाराचे संपूर्ण प्रशासन बौद्ध समाजाच्या ताब्यात दिले जावे आणि व्यवस्थापन समितीतील सर्व प्रतिनिधी बौद्ध असावेत, बुद्धगयाच्या प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी प्रशासनातील कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नवीत तरतुदी लागू कराव्यात, बुद्धगयाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाचे संरक्षण करण्यासाठी विशेष तरतुदी लागू कराव्यात, बुद्धगयाच्या संवर्धन आणि विकासामध्ये स्थानिक बौद्ध समुदायाचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करणाऱ्या आवश्यक तरतुदी समाविष्ट कराव्यात, बुद्धगयाच्या संवर्धन, सुधारणा आणि पुनर्स्थापनेसाठी सरकारने विशेष आर्थिक मदतीची आणि अनुदानाची तरतूद करावी या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी सभापती वि. ल. मोहिते, उपसभापती डॉ. संजय कांबळे-बापेरकर, अध्यक्ष विठोबा पवार, सरचिटणीस चंद्रकांत तांबे, खजिनदार देवराज तांबे, अध्यक्ष (ग्रामीण) प्रीतम रुके, उपाध्यक्ष (ग्रामीण) सिद्धार्थ सावंत, सरचिटणीस (ग्रामीण) संदेश पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.