जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत गुरूवारी होणार जाहीर
रत्नागिरी : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण सोडत गुरूवारी काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ही जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समितीच्या बाबतीत संबंधित तहसीलदारांकडून आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. पंचायत समिती आरक्षण सोडतीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकार्यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्याची नियुक्ती केली आहे. सर्वसाधारण, ओबीसी आणि अनुसूचित जाती असे आरक्षण काढले जाणार आहे. ओबीसी आरक्षणासह 62 गट व 124 गणांची सोडत असणार आहे. यामुळे इच्छुकांच्या नजरा या आरक्षणावर लागल्या आहेत. गुरूवारी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद गटाचे शहरातील स्वा. सावरकर नाट्यगृहात तर पंचायत समिती आरक्षण सोडत संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होईल. सर्वसाधारण, ओबीसी आणि अनुसूचित जाती असे आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग निश्चित करण्यासाठी अंतिम प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचा उतरता क्रम विचारात घेतला जाईल. तसेच जिल्हाधिकार्यांनी आरक्षण सोडतीचा अहवाल तसेच सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना अभिप्रायासह निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे 62 गट तर पंचायत समितीचे 124 गण तयार झाले आहेत. ओबीसी आरक्षणाचा विचार केला तर 17 जि.प. गट तर 34 पंचायत समिती गण राखीव होण्याची शक्यता आहे.