
बालविकास विभागाच्या कर्मचार्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
रत्नागिरी ः मे महिना संपत आला तरी जिल्ह्यातील एकात्मिक बालविकासच्या कर्मचार्यांचे माहे मार्च महिन्याचे वेतन अद्याप न झाल्याने कुटुंबाच्या दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात असा यक्षप्रश्न वेतनावर अवलंबून असणार्या या कर्मचार्यांसमोर निर्माण झाला आहे.
एकात्मिक बालविकासच्या कर्मचार्यांच्या वेतनासाठी नवीन वेतन प्रणाली विकसित होत असल्याच्या कारणास्तव मागील मार्च व एप्रिल या दोन महिन्यांचे वेतन आदा करण्यात आलेले नाही. वास्तविक मार्च महिना हा वार्षिक आर्थिक व्यवहाराचा अखेरचा महिना असल्याने मार्च महिन्याचे वेतन मिळणे कर्मचार्याना अपेक्षित होते. मात्र मागील आर्थिक वर्षातील अखेरचा मार्च महिना संपून दोन महिने होत असले तरी मार्चचे वेतन कर्मचार्यांना आदा करण्यात न आल्याने कर्मचार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.