
सर्व ठिकाणची मतमोजणी २१ डिसेंबरलाच! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय!
निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरवातीला २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र, न्यायलयीन खटल्यांचा पेच निर्माण झाल्याने २४ नगरपरिषदा आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. येथे २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आज (२ डिसेंबर) आणि २० डिसेंबर रोजी मिळून दोन्ही टप्प्यांतलं मतदान पार पडल्यानंतर सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत.
सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंबंधी निर्णय दिला आहे. न्यायालयाने म्हटलं आहे की आज मतदान झालं तरी सरव नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी केली जाईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. तर, २० डिसेंबर रोजी मतदानानंतर अर्ध्या तासाने एक्झिट पोल जाहीर केले जातील.
बुधवारची मतमोजणी रोखण्याच्या न्यायालायच्या इशाऱ्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकत्रित २१ डिसेंबरला घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरु झाल्या होत्या. आज न्यायालयात त्यावर शिक्कमोर्तब झालं.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी अजून न्यायालयाचा निकाल वाचलेला नाही. पण खंडपीठाने दिलेला निकाल सगळ्यांना मान्यच करावा लागेल. गेले २५ ते ३० वर्षे मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय. पण असं पहिल्यांदाच घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, त्याचे निकाल देखील पुढे ढकलले गेले आहेत. ही पद्धत योग्य वाटत नाही.”




