
राज्यात २४ ते ३१ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; ‘या’ भागात पडणार सर्वाधिक पाऊस!
*मुंबई :* भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार २४ ते ३१ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असून काही भागांतच समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यातील इतर काही भागात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे या अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील शेती, पाणीसाठा आणि पिकांची स्थिती लक्षात घेता, आगामी काही दिवसांतील पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. साधारण सोमवारपर्यंत पावसाचा फारसा जोर नसेल, अधूनमधून हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानंतर मात्र पाऊस पुन्हा जोर धरेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.*मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला दिलासा*विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी या भागामधील शेतीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.*शेतकऱ्यांना दिलासा, पाणी साठ्यांवरही परिणाम*सध्या राज्यातील काही धरणांत पाणीसाठा कमी आहे. पावसाचा अंदाज खरा ठरल्यास शेतीसोबतच पाणी साठ्यांमध्येही वाढ होण्यास मदत होईल. पेरणी पूर्ण झालेल्या भागांत पिकांसाठी आवश्यक असलेला पुढील टप्प्यातील पाऊस वेळेत मिळाला तर पिकांवर सकारात्मक परिणाम होईल.*पावसाची अनियमितता*राज्यात यंदा मोसमी पाऊस विस्कळीत स्वरूपात सुरू आहे. जून महिन्यात काही भागांना पावसाने झोडपले असले तरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पावसाची अनियमितता स्पष्ट दिसून आली आहे.
कोकण किनारपट्टीवरील भागात सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती मंदावलेली असून खालच्या बाजूस म्हणजेच कर्नाटक, केरळ किनारपट्टीला वारे सक्रिय झाले आहेत. याचबरोबर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाचे क्षेत्र, तसेच कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर वारे सक्रिय झाल्याने सध्या राज्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, २४ जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
*मुसळधार पावसाचा अंदाज (येलो अलर्ट)*रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर घाट परिसर , सातारा घाट परिसर*विजांसह पावसाचा अंदाज*सोलापूर, लातूर, अकोला, अमरावती