
भारत-पाकिस्तान दोन्हींमध्ये तात्काळ युद्धविराम! ट्रम्प यांचा दावा
भारत-पाकिस्तान संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना दोन्ही देशांकडून तात्काळ युद्धविराम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.आमच्या दीर्घ चर्चेनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला असल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. तसंच यासाठी दोन्ही देशांचं त्यांनी अभिनंदनही केलं आहे. पण भारताकडून अद्याप यावर अधिकृतरित्या कुठलंही भाष्य करण्यात आलेलं नाही.रात्री अमेरिकेच्या दीर्घ मध्यस्थी चर्चेनंतर मला हे जाहीर करायला आनंद होतोय की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी पूर्णपणे आणि तात्काळ युद्धविराम करण्याचं मान्य केलं आहे. यासाठी दोन्ही देशांचं अभिनंदन करतो. या प्रकरणाकडं लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं की, “पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत, त्यांच्या सार्वभौमत्वाशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता”भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय डीजीएमओंना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रात सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दोन्ही बाजूंना देण्यात आले आहेत” यानंतर १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये पुन्हा चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.