खेर्डी, गाणे-खडपोली एमआयडीसीमध्ये सातत्याने होतोय वीजपुरवठा खंडित उद्योजक त्रस्त.

खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो किंवा कमी-जास्त दाबाने पुरवठा होत असल्याने उद्योजकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.दोन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये वीज पुरवठामध्ये सातत्य रहावे, अशी मागणी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोशिएशनने येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. गेडाम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी अभियंत्यांशी राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून उद्योजकांच्या अडचणी समजून तातडीने उपाययोजना करावी अशा सूचना दिल्या.

राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी याविषयी लवकरच बैठक आयोजित करण्याची ग्वाही दिली आहे.यावेळी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी, उपाध्यक्ष गजानन कदम, सह-कार्यवाह अविनाश शिंदे, थ्रीएम पेपर मिलचे स्वामी, उदय शेंडे, रौफ खतीब, शशिकांत देसाई, वैभव सुर्वे, तुकाराम डबाणे आदी उपस्थित होते.

या निवेदनानुसार खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित किंवा कमी जास्त दाबाचा होत असल्याने उद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यात सुधारणा न झाल्यास उद्योजकांचे नुकसान होऊन रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. संघटनेला खालील प्रमाणे बदल अपेक्षित आहेत.

सर्व प्रथम एम.आय.डी.सी एरियामधील विद्युत पुरवठा करणारा फिडर हा स्वतंत्र ठेवावा जेणेकरून त्याचा मेंटनंस ब्रेकडाऊन पिरीयड कमी होईल. तसेच या एरियातील सर्व कनेक्शन पोल वरून न देता अंडरग्राऊंड केबलींग ने द्यावे त्यामुळे एम.आय.डी.सी एरियात येणार्‍या मोठ्या कंटेनर तसेच पावसाळ्यातील वादळवार्‍यामुळे होणारा शटडाऊन टाळता येईल, असे म्हटले आहे.सध्या खेर्डी व खडपोली भागात असलेल्या वीज मंडळाचा कर्मचारी आणि आधीकारी यांना त्यांच्या कामाबाबत पूर्ण माहिती नाही अथवा त्यांना विद्युत पुरवठा बंद झाल्याने उद्योजकांच्या अडचणी व नुकसानीचे गांभीर्य नाही असे दिसून येते. तरी सर्वप्रथम त्यात त्वरित बदल होऊन आमच्या औद्योगिक क्षेत्राच्या देखभालीसाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button