आंबोळगडमधील महिलेचा सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू

राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील सुविधा सुगंध वाडेकर यांना 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घराशेजारी काम करत असताना सर्पदंश झाल्याची घटना घडली होती.याबाबत ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर त्यांना श्रीपाद करगुटकर, शेजारी आणि काही ग्रामस्थांनी जवळचे रुग्णालय म्हणून जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.मात्र, तेथे कोणी कर्मचारी किंवा डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या ठिकाणी किरकोळ प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रत्नागिरी येथे नेण्यास सांगण्यात आले. यामध्ये बराच कालावधी निघून गेल्याने आणि वेळेवर उपचार न झाल्याने रत्नागिरी येथे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचार्‍यांनी कोणता साप चावला आहे हे समजण्यासाठी साप घेऊन या, असे सांगण्यात आले. सर्पदंश झाल्यावर त्या महिलेवर प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर आणि योग्य उपचार न झाल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला असून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या महिलेवर उपचार का झाले नाहीत, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button