
मराठी शाळा संपविण्याचा सरकारचा घाट : हर्षवर्धन सपकाळ
इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्लाबोल केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देतात आणि आता भाषा चिरडून टाकणे सुरू आहे. केंद्र सरकर किती क्रूर आहे, याचे हे उदाहरण आहे. माय बोली शिक्षण बंद करून मराठी शाळा संपविण्याचा सरकारचा घाट आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.ते पुढे म्हणाले की, शिक्षण महाग होत चालले आहे. संविधान विविधेतेचे वैशिष्ट आहे. प्रादेशिक भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे. दक्षिणेतील राज्यांचा हिंदी भाषेवर वेगळा दृष्टिकोन आहे.
मराठी भाषा आमच्यासाठी अस्मिता आहे. भाषेत घोळ घालण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. भाजपकडून प्रादेशिक भाषा संपविण्यासाठी भाषावार राज्यावर बुलडोझर चालविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप करुन या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी यावेळी केली.नळ नाही, पाणी नाही, उलट लोकांचे बळी जात आहेत, हा मोदी सरकारचा नाकार्तेपणा आहे. काका, खोक्या गँग अशी नावे महाराष्ट्राला मिळालेली आहेत. बीडमधील अत्याचार थांबलेला नाही, रिंगण करून मारणे, महिला वकिलाला अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. असा प्रकार पुन्हा एकदा बीडमध्ये पाहायला मिळाला. आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. या आधी आम्ही राजीनामा मागितला होता. मात्र, ते राजीनामा देत नाहीत. या आधी मागणी केली होती की राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री द्या. महाराष्ट्राचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहेत का? हा प्रश्न पुन्हा नव्याने सर्वांसमोर आलेला आहे.