
.उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येण्याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच मांडली सडेतोड भूमिका; म्हणाले, “आमच्यातील वाद…”.
महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांना घेऊन शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने एकत्र यावं, अशी भूमिका आतापर्यंत अनेकांनी जाहीरपणे व्यक्त केली. राज्यातील सामान्य कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. मात्र, एकत्र येण्याच्या या चर्चेवर भाष्य करण्यास दोन्ही ठाकरेंनीही कायम टाळाटाळ केली. मात्र, यावर आज राज ठाकरे यांनी दिलखुलास भाष्य केलं आहे. ते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.*उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांना विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.
माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा.”“एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही (एकनाथ शिंदेंच्या बंडासारखं) तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टाळी दिली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.