
भूकंपामुळे थायलंड उद्ध्वस्त, 100 पेक्षा जास्त मृत्यू, हजारो भारतीय अडकल्याची भीती
7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने म्यानमार आणि थायलंड हादरलं आहे. या भूकंपाचे धक्के भारत, बांगलादेश, चीन, लाओस आणि थायलंडमध्येही जाणवले आहेत. सुरूवातीच्या आकडेवारीनुसार भूकंपामध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच थायलंड, बँकॉकमध्ये फिरायला गेलेले हजारो भारतीयही अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मशीद पडल्यामुळे 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
हा भूकंप एवढा तीव्र होता की बँकॉकमधील एक निर्माणधीन बहुमजली इमारत कोसळली आहे. या इमारतीमध्ये काम करणारे 43 मजूर अडकले आहेत. तर म्यानमारमध्ये अनेक ठिकाणी इमारती तसंच पूल कोसळल्याचं वृत्त आहे. तसंच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
या भूकंपाचा सर्वाधिक परिणाम थायलंडमध्ये झाला आहे. या शक्तिशाली भूकंपानंतर थायलंडचे पंतप्रधान पंतोगर्टान शिनावात्रा यांनी आपत्कालीन बैठक घेतली. भूकंपानंतर त्यांनी फुकेत बेटाचा त्यांचा अधिकृत दौराही पुढे ढकलला आहे. तसंच थायलंडमध्ये आणीबाणीही लागू करण्यात आली आहे.
या भूकंपामुळे 100 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू मान्यमार होता. म्यानमारमध्ये 7.7 आणि 6.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे दोन जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले येथील प्रसिद्ध अवा पूल इरावती नदीत कोसळल्याचं वृत्त आहे. या भूकंपांनंतर त्सुनामीचा धोकाही वर्तवण्यात आला आहे.