
“देवेंद्र फडणवीस तुमचे पोलीस खाते भ्रष्ट झाले आहे”, संतोष देशमुख हत्येच्या तपासावर प्रकाश आंबेडकरांची टीका!
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. यामुळे पोलिसांवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशात या संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यावेळी आंबेडकर यांनी फडणवीसांचे पोलीस खाते पूर्णपणे भ्रष्ट झाल्याचे म्हटले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्येतील फरार आरोपी आणि या प्रकरणाच्या तपासावरून प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर पोस्ट केली असून, त्यामध्ये ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस यंत्रणेवर अजिबात नियंत्रण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यू प्रकरणी पहिल्यांदा स्थानिक पोलिसांनी चौकशी केली. त्यांना देशमुख हत्येप्रकरणी काहीही सापडले नाही. त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही. त्यानंतर सीआयडीने चौकशी केली, त्यांनाही काही सापडले नाही. आता चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. पुढे काय करणार? तर ही केस सीबीआयला देणार!”
या पोस्टमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी पुढे लिहिले आहे की, “देवेंद्र फडणवीस तुमचं पोलीस खातं पूर्णपणे भ्रष्ट झाले आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नुसत्या कमिट्या स्थापन करून उपयोग नाही. ज्यांनी या प्रकरणाचा तपास योग्य केला नाही, त्यांना विचारा की तपास का झाला नाही? याचे उत्तर नसेल तर त्यांना सेवेतून सरळ निलंबित करा.”
जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घून हत्या करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. यामुळे सरकारसह पोलिसांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान या प्रकरणी सर्वप्रथम स्थानिक पोलिसांनी, त्यानंतर पोलीस अधिक्षकांनी व पुढे सीआयडीने चौकशी केली, पण यामधून अद्याप ठोस असे काहीही समोर आलेले नाही.