
उदय सामंत यांच्याविरोधात आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे माजी खासदार- विनायक राऊत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. साधारण सात ते आठ दिवसात जागावाटपावर अंतिम तोडगा निघणार आहे. राज्यातील बहुतांश जागांवर आमचं एकमत झालं आहे.काही ठराविक जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे. साधारण दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवार जाहीर करण्यात येईल अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. त्याचबरोबर आमची तर १४० जागांवर लढण्याची तयारी होती. परंतु महाविकास आघाडीत सहा पक्ष असल्याने जागावाटपाचं वर्गीकरण केलं जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले.यातच कोकणातील चिपळून मतदारसंघ सोडला तर सर्वच मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे या सर्व जागांवर ठाकरे गटाकडून विद्यमान आमदारांनी आपापला दावा सांगितला आहे. चिपळून मतदारसंघात मागच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून आला आहे. त्याठिकाणी देखील आमची चर्चा चालु आहे. यातच सावंतवाडी मतदारसंघात सेनेचा आमदार निवडून आला आहे. त्यामुळे तोही मतदारसंघ आमच्या ताब्यात राहिल. असेही त्यांनी सांगितले उदय सामंत यांच्याविरोधात विरोधकांकडे सक्षम उमेदवार नसल्याची टिका केली जात आहे. परंतु आमच्या पक्षाकडे त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार आहेत. याठिकाणी महाडिक तसेच बने यांच्यासारख्या नेत्यांनी आधीच तयारी केली आहे. काहीही नेते निवडणूक लढविण्यासाठी तयार आहेत. परंतु हे दोन नेते ज्येष्ठ असल्याने त्यांनी माघार घेतल्याचे विनायक राऊतांनी सांगितले.यातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट अलिकडेच झाल्याचा दावा वंचितने केला होता. त्यावर देखील विनायक राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त चर्चा होऊच शकत नाही. आज सुद्धा जर नरेंद्र मोदी चर्चेला तयार आहेत. अमित शाह कधीही चर्चा करायलातयार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ज्या कंड्या पिकवल्या जात आहेत. त्या भाजपनेच सोडलेलं पिल्लू आहे. त्यांनी याआधीही अशा कंड्या पिकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.