रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इतिहासामध्ये प्रथमच ओबीसी महिलेसाठी आरक्षण
रत्नागिरी : जि. प. च्या अध्यक्षपदासाठी इतिहासामध्ये प्रथमच महिला ओबीसीसाठी राखीव आरक्षण पडले आहे. आता निवडणूक कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या 62 गटांचे आरक्षण दोन महिन्यापूर्वी जाहीर झाले आहे. आरक्षणानंतर सभागृहात कोण कोण असणार? याबाबत थोडीफार कल्पना आली आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा या निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता शुक्रवारी राज्यातील निवडणूक असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद इतर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव ठेवण्यात आले आहे. हे अडीच वर्षासाठी असणार आहे. जि. प. चा अध्यक्षपदाचे आरक्षण बघितले तर प्रथमच हे आरक्षण पडले आहे. महिला आरक्षण पडल्याने इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. असे असले तरी काही इच्छुक पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून आतापासूनच फिल्डींग लावताना दिसत आहेत.